Ration l नागरिकांसाठी महत्वाची बातमी! रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जून महिन्यात

पुणे : पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल 31 मे पर्यंत व वाटप 30 जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली या तालुक्यातील तहसिलदारांनी त्या अनुषंगाने एनएसएफए अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट 2025 पर्यंतच्या अन्नधान्याची उचल व वाटप विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट 2025 पर्यंतच्या धान्याची उचल रास्तभाव दुकानामधून करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुधळकर यांनी केले आहे.