Get in on
लोणावळा : राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झालेले श्री. भूषण दत्तात्रय माने यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून आज कार्यभार स्वीका�
लोणावळा : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणावळा येथील महिला मंडळ सभागृहात ‘मेहता म्युझिकल’ व ‘एम अँड ए म्युझिकल अकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सारे जहाँ से अच्छा �
लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक हुंडाई आय-१० कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत कुसगाव येथील आयआरबी कार्यालय परिसरात एका कारमधून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित शुभम शर्मा हा कारमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० (क्र. एमएच १४ बीके ७२३५) कारची झडती घेण्यात आली.झडतीदरम्यान पोलिसांना ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित शुभम शर्मा याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला होता. लोणावळा व मावळ परिसरात अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
मावळ (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील माऊंट सेन्ट हायस्कूल मधील चि. श्रीरूप प्रशांत जगताप याने 298 पैकी 276 गुण संपादन करून सीबीएससी आयबीएससी विभागात महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांक मिळवला. यापूर्वी इयत्ता पाचवीत असताना झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला होता. श्रीरूपच्या या यशाने तळेगावच्या शैक्षणिक नावलौकिकात भर टाकलेली आहे. गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून तो राज्यात सर्वप्रथम आला आहे. त्याला उत्कर्ष प्रबोधिनीचे विपुलकुमार भुसारे यांनी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही अतिशय कठीण परीक्षा असून ती स्पर्धा परीक्षेचा पाया मानली जाते. सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी व विविध क्लुप्त्यांचा वापर यामुळे हे यश संपादन झाले असे श्रीरुप याने सांगितले. नुकत्याच झालेल्या मंथन परीक्षेतही तो राज्य गुणवत्ता यादीत आला होता. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत तो तळेगावच्या नावलौकिकात सातत्याने भर टाकत आहे. श्रीरूपची आई वडगाव जवळील केशवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका असून महाराष्ट्र राज्य मराठी निबंध स्पर्धेत त्यांनीही यापूर्वी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. श्रीरूप हा आदर्श मुख्याध्यापक स्व. जनार्दन माळी सर यांचा नातू असून त्याला शैक्षणिक वारसा त्याच्या कुटुंबातूनच लाभलेला आहे. श्रीरूपच्या या यशाबद्दल मावळ विधानसभेचे आमदार सुनील आण्णा शेळके, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अशोक शेलार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक सत्यम खांडगे, अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहूमामा शेलार, माजी नगरसेवक पोपटराव भेगडे, शिक्षक नेते राजू भेगडे, युवा नेते सुहास माळी, योगेश माळी यांनी अभिनंदन केले आहे.
पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
खोपोली (प्रतिनिधी) : प. पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खोपोली येथे विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ चा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारी, सेवाभाव तसेच लोकशाही मूल्यांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन शांताराम हिरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, के.टी.एस.पी. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अबूबकर जळगावकर, पी. पी. गांगगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष दिनेश गुरव, विश्वस्त राजेश अभाणी आणि प्राचार्य डॉ. गौरव एन. तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या पदग्रहण सोहळ्याला सुरुवात झाली. विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज व सॅश प्रदान करून त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे सोपविण्यात आल्या. मास्टर सार्थक बाबासाहेब खोजे आणि कु. एलेना राजू इलंजीकल यांनी अनुक्रमे हेड बॉय आणि हेड गर्ल म्हणून पदभार स्वीकारला. तसेच मास्टर प्रेम अनिल भालेराव आणि कु. अनन्या महेश पाटील यांनी उपविद्यार्थी प्रमुख म्हणून पदग्रहण केले. याचबरोबर सांस्कृतिक, आरोग्य, वित्त व शिस्त मंत्री, विविध हाऊसचे कॅप्टन, उपकॅप्टन आणि प्रीफेक्ट्स यांनाही पदचिन्हे प्रदान करण्यात आली. सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी आणि सेवाभावाने आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन शांताराम हिरे यांनी विद्यार्थी नेतृत्व परिषद निवडणूक ही केवळ पदे निवडण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आजची तरुणाई देशाची दिशा बदलण्याची मानसिकता ठेवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आणि लोकशाही मूल्ये जपण्याची शिकवण देणारे असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत.” विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांचा आदर करावा, शिस्त व नैतिक मूल्यांचे पालन करावे तसेच मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासाबरोबरच इतरांच्या हितासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. गौरव तिवारी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी परिधान केलेला बॅज हा अधिकाराचे नव्हे तर जबाबदारीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, शिस्त आणि सेवाभाव या मूल्यांना आपल्या नेतृत्वाचा आधार बनवून इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नेतृत्वगुणांसोबतच जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणारा हा शपथविधी सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
