Breaking news
दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप

ठळक बातम्या

लोणावळा

भाजपा लोणावळा शहर व नाणे मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात; साखर, चहा पावडर छत्र्या व अन्न पॅकेट वाटप

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना भाजपा लोणावळा शहर व नाणे मंडळाच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे. भाजपाच्या वतीने नागरिकांना 50

नांगरगावात पूर परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या नाल्यावरील त्या अतिक्रमणावर कारवाई; नगरसेवक सुभाष डेनकर यांच्या भूमिकेचे कौतुक

लोणावळा : नांगरगावात आजपर्यंत केव्हाही न झालेली पूर परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती. या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या आल्यावर त्या अतिक्रमणावर आज अखेर लोणावळा नगर परिषदेने कारवाई केल�

क्राईम-न्युज

मोठी बातमी l पाटण गावावर अस्मानी संकटानंतर सुलतानी संकट! दरडीच्या भीतीने गाव खाली करताच चोरट्यांनी अनेक घरे फोडली

लोणावळा : मावळ तालुक्यातील पाटण गावाला निसर्गाच्या कोपानंतर आता मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे. ६ जुलै रोजी घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेनंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण गाव खाली करण्यात आले होते. मात्र, याच आपत्तीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बुधवारी (८ जुलै) रात्री गावात अक्षरशः हैदोस घातला. एकाच रात्री १५ ते २० बंद घरांची कुलूपे आणि कड्या तोडून लाखो रुपयांचे दागदागिने व रोख रक्कम लंपास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या दुहेरी संकटामुळे पाटण ग्रामस्थांमध्ये तीव्र भीती आणि प्रशासनाविरोधात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.नेमके काय घडले?६ जुलै रोजी डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाटण गावात दरड कोसळून एकाच घरातील ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाटण गावाला मोठा धोका निर्माण झाल्याचे पाहत प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना गाव खाली करण्याचे आदेश दिले. जीवाच्या भीतीने व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी आपली घरे बंद केली आणि ते नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले.       गाव संपूर्णपणे सुने असल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. बुधवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी गावात प्रवेश केला आणि एकामागून एक तब्बल १५ ते २० घरांच्या कड्या व कुलूपे तोडून घरफोड्यांचा सपाटा लावला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, पैसे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरून चोरटे पसार झाले."आम्ही गाव खाली केले, मग प्रशासनाने सुरक्षा का केली नाही?" – ग्रामस्थांचा संतप्त सवालया घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी गावात धाव घेतली. आपल्या घरांची झालेली दुरवस्था आणि चोरीला गेलेला ऐवज पाहून नागरिकांचा संयम सुटला. "प्रशासनाच्या सूचनेचा मान राखून आम्ही आमची घरे दारे सोडून बाहेर गेलो. मग आमच्या मागे गावाची आणि आमच्या मालमत्तेची सुरक्षा करण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? गावात किमान दोन पोलीस कर्मचारी जरी गस्तीला ठेवले असते, तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. एका बाजूला हक्काचे घर सोडून जाण्याचे दुःख आणि दुसरीकडे साठवलेली पुंजी चोरीला गेल्याचा धक्का, आम्ही आता जगायचे कसे?" असा प्रश्न  संतप्त ग्रामस्थानी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:1)नुकसान भरपाई मिळावी : नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच हवालदिल झालेल्या नागरिकांना या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.2) चोरांना तात्काळ अटक : पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा. तसेच नैसर्गिक आपत्तीचा फायदा घेणाऱ्या या चोरट्यांना कडक शासन करावे.3) गावात २४ तास पोलीस बंदोबस्त : जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत रिकाम्या असलेल्या पाटण गावात २४ तास पोलीस गस्त तैनात करण्यात यावी.      या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, आपत्तीच्या काळातही माणुसकी विसरणाऱ्या चोरट्यांचा आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. आता यावर मावळ तालुका प्रशासन आणि सरकार काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मावळ

दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; दरड पडण्याच्या धोक्याने नागरिकांना गाव खाली करायला लावले मात्र प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था झाली नाही - नागरिकांचा आरोप

लोणावळा : मावळ तालुक्यातील दरड कोसळलेल्या पाटण गावाकडे मावळ तालुका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सहा जुलै रोजी पाटण गावात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात दरड गावात आल्यामुळे एक घर जमीन दोस्त झाले असून तीन नागरिकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घराच्या आजूबाजूला असलेली 15 ते 20 घरे देखील या राड्यारोड्यामुळे बाधित झाली आहेत. सदर दरड हटवण्याचे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास पुन्हा एक मोठी दरड या ठिकाणी खाली आली व यंत्रणाची पळापळ सुरू झाली. पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रशासनाने गावावर ओढवलेले हे संकट वाढू नये व कोणतीही जीवित हानी होऊ नये याकरिता ग्रामस्थांना गाव खाली करून सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. मात्र प्रशासनाकडून या नागरिकांची कोणतीही राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही.        250 कुटुंब असलेले हे गाव आपले नातेवाईक व सगे सोयऱ्यांकडे मागील चार दिवसापासून राहत आहे. पण किती दिवस आम्ही पाहुण्यांकडे राहणार आमची राहण्याची खाणे पिण्याची व्यवस्था प्रशासन करणार आहे की नाही असा संतप्त प्रश्न या ग्रामस्थांनी उपस्थित करून प्रशासनाच्या विरोधात गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज विशेष ग्रामसभा घेत प्रशासनाचा निषेध नोंदवला. जोपर्यंत प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी गावात येत आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता. अखेर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह पाटण गावात येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द दिल्यानंतर नागरिक शांत झाले. दरम्यान पाटण गावातील नागरिकांसाठी आमदार सुनील शेळके यांनी अन्नधान्याचे किट तयार केले आहेत गावांमध्ये डोंगरावरून आलेला दरडेचा राडारोडा मशनरी लावून बाजूला करून घ्या त्यासाठी जो काही खर्च लागेल तो मी देतो असा शब्द देखील त्यांनी गावच्या सरपंचांना व ग्रामस्थांना दिला आहे.     प्रशासनाच्या सूचनेचा आदर करत पाटण गावातील नागरिकांनी गाव खाली केले व हाच डाव साधत चोरट्यांनी गावावर डल्ला मारला. बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे दरम्यान गावातील पंधरा ते वीस घरांमध्ये चोरट्यांनी कडे तोडत चोऱ्या केल्या आहेत. गावात नागरिक नसताना पोलिसांनी या ठिकाणी कर्मचारी ठेवून ग्रस्त घाणे गरजेचे होते अशा भावना नागरिकांनी व्यक्त केले आहेत. नैसर्गिक आपत्ती व सुलतानी संकट अशा परिस्थितीमध्ये पाटण ग्रामस्थ अडकले आहेत. गावामध्ये येण्या जाण्यासाठी योग्य प्रकारे रस्ते देखील उपलब्ध नाहीत. वनविभागाने रस्त्याचे काम थांबवल्यामुळे शंभर मीटर अंतरावर रस्ता रखडला आहे. मळवली रेल्वे स्टेशन जवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे याकरिता नागरिकांना पर्यायी सेवा रस्ता बनवून देण्यात आला होता तो देखील वाहून गेला आहे. चारही बाजूने पाटण ग्रामस्थांची कोंडी झाल्यामुळे ग्रामस्थांना दुर्घटना घडली त्यावेळी वेळेमध्ये मदत देखील उपलब्ध झाली नाही अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत.        पाटण गावावर एवढे मोठे संकट ओढवून देखील महाराष्ट्र शासनाकडून दरडग्रस्तांना कोणतीही तातडीची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. शासनाने दरडग्रस्तांना तातडीची नुकसान भरपाई द्या, चोरीच्या घटनेमुळे नागरिकांचे झालेले नुकसान भरून द्यावे, पाटण गावाचे पुनर्वसन करावे अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केले आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य दिपाली हुलावळे, मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके यांच्यासह पंचायत समितीचे विविध सदस्य, विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी देखील नागरिकांची भेट घेत त्यांच्या भावना समजून घेतल्या व लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊ असे आश्वासन दिले. लोणावळा ग्रामीण पोलीस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, डॉग्स कोड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झाले असून पाटण गावात चोरीच्या घटनेचा मागमूस घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका, २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. Bमुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले. पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Video News

अन्य बातम्या

“आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती”; नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांचा सामना करण्यासाठी खोपोली पोलीस सज्ज!

खोपोली (प्रतिनिधी) : “आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर प्रभावी नियंत्रणासाठी खोपोली पोलीस स्टेशन पूर्णपणे सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग, प्रतिबंध आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांनी केले.महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या विशेष शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉ. विशाल नेहूल होते. आपत्तीसमयी त्वरित प्रतिसाद देणे, संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू होता.सर्व यंत्रणांचा व सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग        या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, यशवंती हायकर्स, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र संघटना आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, औद्योगिक क्षेत्रातील गॅस गळतीसारख्या आपत्ती आणि महामार्गावरील अपघात अशा विविध संकटांच्या वेळी कोणती उपाययोजना करावी, यावर शिबिरात विशेष भर देण्यात आला. “संकटावर करू मात, देऊ एकमेकांना खंबीर साथ” हा संदेश यावेळी उपस्थितांमध्ये प्रभावीपणे रुजवण्यात आला.मान्यवरांचे मार्गदर्शन आणि समन्वयाचे आवाहनशिबिरात खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, परिवहन सभापती किशोर पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन घरत यांनी आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग, आवश्यक समन्वय आणि सर्व घटकांनी एकत्रितपणे कसे कार्य करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस दलाकडे आधुनिक संसाधने सज्ज: डॉ. विशाल नेहूलअध्यक्षीय भाषणात डॉ. विशाल नेहूल म्हणाले की, "खोपोलीतील प्रशासन, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये संकटसमयी एकजुटीने कार्य करण्याची एक सशक्त परंपरा आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाला आधुनिक संसाधने आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आली असून, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे."'वेळेपूर्वीची तयारी' हेच प्रभावी शस्त्र: पोलीस निरीक्षक सचिन हिरेखोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात “प्रतिबंध, सावधगिरी आणि पूर्वतयारी” या त्रिसूत्रीवर भर दिला. ते म्हणाले की, कोणतेही संकट अचानक येते; मात्र त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वेळेपूर्वीची तयारी, जागरूकता आणि समन्वय हेच आपले सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांनी सर्व घटकांना पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले.बचाव साहित्यांचे थेट प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनशिबिरादरम्यान पीएसआय पूजा चव्हाण यांनी खोपोली पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या आपत्कालीन संसाधनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनकडील विविध बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवण्यात आले. यावेळी नगरपालिकेची फायर ब्रिगेड व्हॅन, फायर मॅन बाईक, गोरखा व्हॅन तसेच स्वामिनी संस्थेची ॲम्ब्युलन्स यांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पीएसआय ज्ञानेश्वर एडवले यांनी केले.खोपोलीकरांचा खंबीर निर्धारआपत्ती व्यवस्थापनात वेळेवर मिळणारा प्रतिसाद, संसाधनांचे योग्य नियोजन, समन्वयाची मजबूत साखळी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव या शिबिराने सर्वांना करून दिली. आगामी काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा धैर्याने व सक्षमपणे सामना करण्यासाठी खोपोली पोलीस आणि नागरिक पूर्णपणे सज्ज असल्याचा निर्धार या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला.

Mavalmaza android application

Coming soon..