Breaking news

ठळक बातम्या

लोणावळा

क्राईम-न्युज

Lonavala Crime News l लोणावळ्यात १ लाख ९३ हजारांचे मेफेड्रॉन जप्त; एमडी विक्रीसाठी आलेल्या तरुणावर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १ लाख ९३ हजार ९०० रुपये किमतीचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हे अंमली पदार्थ जप्त केले असून, एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास मॅकडोनाल्डस खालील वाहन पार्किंग परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार गणेश होळकर यांनी या ठिकाणी धाव घेतली. यावेळी रोहन शंकर साठे (वय २२, सध्या रा. गुरव वस्ती, कुसगाव, ता. मावळ; मूळ रा. आपटी गेव्हंडे, ता. मावळ) या तरुणाची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत अंमली पदार्थ आढळून आला.अंमली पदार्थांचा साठा जप्तपोलिसांनी रोहन साठे यांच्याकडे असलेल्या पदार्थाची तपासणी केली असता, त्यात १९ ग्रॅम ३९ मिलीग्रॅम वजनाचे 'एमडी' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारपेठेत किंमत १ लाख ९३ हजार ९०० रुपये इतकी आहे. रोहन साठे याच्यावर अंमली पदार्थ विक्रीचा उद्देश आणि बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कलम ८(क), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक (मपोसई) गव्हाणे करत आहेत. या कारवाईमुळे मावळ परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.       याविषयी बोलताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, लोणावळा शहरांमध्ये एमडी पावडर, गांजा, चरस अशा अमली पदार्थांची विक्री होत आहे. यावर कडक कारवाई करत तरुणाईला या अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणे यासाठी पोलीस प्रशासन सातत्यपूर्ण कारवाया करणार आहे. अमली पदार्थ तस्करांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

मावळ

शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना १ हजार दप्तरांचे वाटप; वृक्षारोपणासह उपक्रम उत्साहात संपन्न

लोणावळा : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील आदिवासी व अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याने भरलेल्या दर्जेदार दप्तरांचे वाटप करण्यात आले. वह्या, गोष्टींची पुस्तके व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याने सज्ज अशा एक हजार दप्तरांचे वितरण करण्यात येत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.      या उपक्रमासाठी गेल्या दीड महिन्यांपासून संस्थेचे कार्यकर्ते नियोजनबद्ध तयारी करत होते. दप्तरांसाठी निधी संकलन, शैक्षणिक साहित्य खरेदी, दप्तरांची तयारी तसेच वितरणाचे नियोजन यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.       कार्यक्रमाची सुरुवात प्रतिवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करून करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मावळ तालुक्यातील सुमारे ५० दुर्गम भागातील शाळांकडून विद्यार्थ्यांना दप्तरे उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. दप्तर वाटप आणि वृक्षारोपण हे दोन्ही उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी संस्थेच्या भविष्यातील विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘आम्ही पालक’ या उपक्रमाची उद्दिष्टे आणि त्यामागील संकल्पनाही उपस्थितांसमोर मांडली.संस्थेच्या कार्यकर्त्या शुभा मराठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून "चलो कुछ अच्छा करें" हा संदेश देत समाजहिताच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. समाजातील अधिकाधिक लोकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा, असे त्यांनी नमूद केले.       या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेषतः आशुतोष जोशी, नीलाक्षी जोशी, आशुतोष आठल्ये, रितेश गुप्ता, भगवान गायकवाड तसेच संस्थेचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांचे उल्लेखनीय योगदान लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामीण भागातील शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिवसेवा प्रतिष्ठानचे आभार मानत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

पिंपरी-चिंचवड

मोठी बातमी l भिकमुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा राज्यस्तरीय निर्धार; भीक मागणाऱ्यांचे होणार पुनर्वसन

​पुणे : पुणे जिल्ह्याला 'भिकमुक्त' करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 'भिकमुक्त महाराष्ट्र' संकल्पनेचा आदर्श म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न प्रशासन आयोगाची उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुणे जिल्ह्याला पूर्णपणे भिकमुक्त करण्यासाठी विशेष मोहिमेची आखणी करण्यात आली असून, भीक मागणाऱ्या नागरिकांचे केवळ पुनर्वसनच नाही, तर त्यांना सन्मानाने जगण्याचे हक्क मिळवून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे..      राज्य अन्न प्रशासन आयोगाचे अध्यक्ष श्री. महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आयोगाचे सदस्य श्री. रणजीत निंबाळकर, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सदस्य श्री. प्रकाश पोरवाल, अप्पर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश सुधाकर, महिला व बालविकास आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. दिलीप खिलाडी आणि विभागीय उपायुक्त श्री. महेश टिळे यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.​स्थानिक पातळीवर व्यापक मोहीम आणि पुनर्वसन​बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. प्रकाश पोरवाल यांनी स्पष्ट केले की, यापुढे पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ही मोहीम राबवली जाईल. केवळ भीक मागण्यावर बंदी न घालता, संबंधित व्यक्तींच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीने उपाशीपोटी झोपू नये, यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.​सर्वेक्षण आणि सरकारी लाभ​तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिला आणि अनाथ व्यक्तींचे सखोल सर्वेक्षण करून त्याचा अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांना रेशन कार्ड (शिधापत्रिका) आणि हक्काचे घर उपलब्ध करून देऊन त्यांचे सामाजिक पुनर्वसन करण्यात येणार आहे.​नागरिकांना आवाहन आणि प्रशासनाचा इशारा​प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणालाही भीक देऊ नये, त्याऐवजी या मोहिमेला सहकार्य करावे. रस्त्यावर कोणीही भिकारी आढळल्यास त्यांची माहिती स्थानिक स्वराज्य संस्था, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार म्हणून नोंदवावी. दर महिन्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाणार आहे. ​तसेच, मोहिमेच्या अंमलबजावणीमध्ये कसूर करणाऱ्या किंवा कर्तव्य पालनात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही श्री. प्रकाश पोरवाल यांनी दिला आहे. पुणे जिल्ह्याला भिकमुक्त करून एक नवा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.

Video News

अन्य बातम्या

बोरघाटात मोठा अनर्थ टळला; पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि तांत्रिक यंत्रणांच्या समन्वयातून ५ टनांचा दगड सुरक्षित हटवला

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाट परिसरात संभाव्य मोठा अपघात टळल्याची घटना आज घडली. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या मुंबई लेनवरील कि.मी. ४२.००० जवळील आयओडीशी बोगद्याजवळ सुमारे ५० फूट उंचीवर सुमारे ५ टन वजनाचा मोठा दगड संरक्षण जाळीत (रॉक फॉल बॅरियर) अडकून राहिल्याचे निदर्शनास आले होते.      पावसाळ्याच्या तोंडावर हा दगड खाली कोसळल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांनी तातडीने परिस्थितीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी, वाहतूक विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांशी समन्वय साधून तातडीची कारवाई हाती घेण्यात आली.      या संदर्भात अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण सांखळे यांनी विशेष आदेश जारी करून १८ जून रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत संबंधित भागातील वाहतूक नियंत्रित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे दगड हटवण्याचे काम अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे शक्य झाले.या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे-मंडव, पोलीस निरीक्षक भरत शेंडगे, प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, खंडाळा आणि वडगाव येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.      महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते, आयआरबी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि संरक्षक जाळी उभारणाऱ्या मेकाफेरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे साईट इंजिनिअर अक्षय परशिया व अभिजीत सावंत यांनी त्यांच्या तांत्रिक पथकासह ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.संपूर्ण कारवाईदरम्यान पोलीस विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि तांत्रिक पथक यांच्या अचूक समन्वयामुळे कोणतीही जीवितहानी अथवा अपघात घडला नाही. दुपारी १.४० वाजेपर्यंत दगड सुरक्षितरीत्या खाली उतरवून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या संयुक्त आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे एक मोठा संभाव्य अनर्थ टळला असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व यंत्रणांच्या सतर्कतेचे, कार्यतत्परतेचे आणि समन्वयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Mavalmaza android application

Coming soon..