Breaking news

Bhushi Dam l भुशी धरणाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष; पायऱ्यांची दुरवस्था आणि स्थानिकांचा रोजगार हिरावल्याने संताप - नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे

लोणावळा : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या भुशी धरण परिसरात पर्यटकांची सुरक्षितता आणि स्थानिकांचा रोजगार असे दुहेरी प्रश्न गंभीर झाले आहेत. धरणाचा परिसर रेल्वे प्रशासनाच्या मालकीचा असून, मागील काही काळापासून येथील पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे, रेल्वे प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या हातातील रोजगारही हिरावला गेला आहे. या दोन्ही मुद्द्यांकडे रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केली आहे.

पायऱ्यांची पडझड, पर्यटकांच्या जीवाला धोका

भुशी धरण परिसरातील पायऱ्यांवर बसून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पायऱ्यांवरील दगड निखळून वाहून गेल्याने, सध्या हा परिसर पर्यटकांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तातडीने या पायऱ्यांची डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी सोनवणे यांनी केली आहे.

स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

केवळ पर्यटकांची सुरक्षाच नव्हे, तर स्थानिकांचा उदरनिर्वाह हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने भुशी धरण परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अनेक वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिकांची दुकाने तोडून टाकली आहेत. यामुळे पर्यटकांना धरणावर आल्यानंतर पिण्याच्या पाण्यापासून ते चहा-नाश्त्यापर्यंतची सोय मिळणे दुरापास्त होणार आहे, तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतरही प्रश्न 'जैसे थे'

या समस्यांबाबत मागील महिन्यात मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार सुरेश आण्णा शेळके, नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सभापती धनंजय काळोखे आणि इतर नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे रेल्वेच्या डीआरएम (DRM) यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, या भेटीला बराच कालावधी उलटूनही रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही, असेही नगराध्यक्ष सोनवणे यांनी खंत व्यक्त करताना सांगितले. आता रेल्वे प्रशासन या गंभीर बाबींची दखल घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पायऱ्यांची दुरुस्ती आणि स्थानिकांच्या रोजगारासाठी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


इतर बातम्या