Lonavala News l पावसाचा जोर ओसरला व लोणावळा शहरातील पुराचा धोका तूर्तास टळला !
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा जोर मागील दोन दिवसापासून काही कमी झालं व त्यामुळेच लोणावळा शहरातील पुराचा धोका तूर्तास टळला आहे. लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे वलवण धरण 90% हून अधिक भरले व टाटा कंपनीने जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबतची लेखी माहिती देत लोणावळा शहरामध्ये स्वयंचलित दरवाजे द्वारे पाणी सोडण्याचा इशारा दिला होता. ज्या भागामध्ये पाण्याचा विळखा बसू शकतो अशा भागांमध्ये पी एस सिस्टीम द्वारे सूचना देत नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळवण्यात आले होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रातून पाणी सोडले जाणार होते. मात्र निसर्गाने लोणावळाकरांना साथ दिली, व पावसाने आपला जोर कमी केला यामुळे लोणावळा शहरांमध्ये निर्माण झालेली दुसरी पूरपरिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच थांबली आहे.
लोणावळा शहरामध्ये टाटा कंपनीचे वलवण धरण आहे. या धरणामधून लोणावळा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढून 90% च्या पुढे गेली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास व डोंगर भागांमधून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास धरण 100% भरून ओव्हर फ्लो होऊ शकतो, याकरिता धरणातून काही प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची तयारी टाटा कंपनीने केली होती. याबाबत नागरिकांना आगाऊ सूचना देण्यात आल्या होत्या सुदैवाने पावसाचा जोर कमी झाला व लोणावळा शहरावर आलेले दुसरे पुराचे मोठे संकट दूर झाले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी टाटा कंपनीने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या दिवशी 100 क्यूसेक्स वेगाने व दुसऱ्या दिवशी 90 क्यूसेक्स एक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवला आहे.
मान्सूनच्या पावसाचे दोन महिने संपले असले तरी आजुन ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे कधीही, कोठेही व कसाही पाऊस पडत आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये जुलै महिन्यासारखा पाऊस पडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ती नियंत्रण ठेवण्यासाठी धरणामधून पाणी काही प्रमाणामध्ये सोडले जात आहे. लोणावळा मान्सून लेक मधील पाणी पातळी देखील नियंत्रणात ठेव्यात आली आहे. या पाण्यामुळे सध्यातरी पुराचा कोणताही धोका नसून पावसाचा वेग वाढल्यास मात्र हा धोका उद्भवू शकतो. याकरता प्रशासनाने हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेत वेळेवेळी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.



















