Breaking news

लोणावळ्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढा – राष्ट्रवादीचे नासीर शेख यांची एस.पी. पुणे ग्रामीण यांच्याकडे मागणी

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर स्थानिक नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लोणावळा शहराचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नासीर शेख यांनी केली आहे. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना याबाबत निवेदन दिले आहे.

       या पत्रात नासीर शेख यांनी म्हटले आहे की, लोणावळ्यात वर्षभर वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून, चालणे सुद्धा कठीण झाले आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक आहे. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या 50 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत पोहोचते. या गर्दीमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. योग्य नियोजन केल्यास काही महत्त्वाच्या ठिकाणी असलेले 'बॉटल नेक्स' (वाहतूक अडथळ्याची ठिकाणे) दूर करून वाहतूक सुरळीत होऊ शकते.

जुना मुंबई-पुणे महामार्गावरील प्रमुख वाहतूक अडथळ्याची ठिकाणे:

  1. डेला रिसॉर्टच्या प्रवेश/निर्गम बिंदूजवळ
  2. अपोलो गॅरेजजवळ
  3. कुमार चौक
  4. A1 चिक्कीजवळ
  5. मुंबई मसाला हॉटेलजवळ
  6. ऑर्किड हॉटेलजवळ
  7. मॅप्रो गार्डनजवळ

शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे:

  1. मावळी पुतळा चौक
  2. महाराष्ट्र वाईन शॉपजवळ
  3. कुमकुम जनरल स्टोअर्सजवळ (रेल्वे स्थानकाचा प्रवेश/निर्गम रस्ता)
  4. छत्रपती शिवाजी महाराज चौक
  5. वेलनेस मेडिकलजवळ
  6. बँक ऑफ महाराष्ट्रजवळ
  7. भंगारवाडी चौक

भुशी धरणकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळे:

  1. वुडलँड हॉटेल चौक
  2. टाटा ब्रिज
  3. भुशी धरण परिसर

शेख यांनी सुचवले आहे की, पोलिस कर्मचारी व नगर परिषदेकडून नियुक्त वॉर्डन्स यांचे प्रभावी व्यवस्थापन करावे. शहरात काही रस्ते एकेरी (वन-वे) करावेत, सम - विषम पार्किंग सक्तीची करावी, आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या  व बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या वाहनांवर टोईंग व्हॅन द्वारे कारवाई करावी. पुढील 15 दिवसात यावर योग्य कारवाई न झाल्यास, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लोणावळा शहर ‘मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन’ करेल असा इशाराही शेख यांनी या पत्रात दिला आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पोलीस प्रशासनच जबाबदार असेल, असेही त्यांनी नमूद केले.

इतर बातम्या