Breaking news

लोणावळा नगर परिषदेमध्ये जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची आढावा बैठक संपन्न; विविध समस्यांचा घेतला आढावा

लोणावळा : लोणावळा शहरामधील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्प व रखडलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या विनंतीवरून सदरची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये लोणावळा शहरांमधील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढील तीन महिन्यांमध्ये या समस्या सोडवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे देखील आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी लोणावळाकर नागरिकांना दिले आहे. 

     लोणावळा शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असताना देखील मागील तीन ते साडेतीन वर्षापासून बंद अवस्थेत असलेल्या नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची जिल्हाधिकारी पुणे यांनी पाहणी करत तात्काळ या कामाला सुरुवात करा असे आदेश लोणावळा नगरपरिषद प्रशासन व काम करणाऱ्या संबंधित एजन्सीला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून या कामासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. लोणावळा शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी वाहतूक कोंडी मधून मार्ग काढत राष्ट्रीय महामार्गाच्या काही भागाची पाहणी केली. कुमार चौक या ठिकाणी जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी आमदार सुनील शेळके यांच्यासह ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न व सूचना यांचा देखील विचार केला जाईल व त्याप्रमाणे कारवाई केले जाईल असे देखील त्यांनी सांगितले. 

     लोणावळा शहरांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जड व अवजड वाहनांना बंदी असताना देखील केवळ आदेशाचे पालन होत नसल्यामुळे या वाहनांची वाहतूक सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताची संख्या वाढली असल्याचे डॉ. किरण गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले. लोणावळा शहर पोलीस व खंडाळा महामार्ग पोलीस यांच्या समन्वयाचा अभाव असल्यामुळे दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे हातवारे करत जबाबदारी झटकत असल्यामुळे आदेशाचे पालन होत नाही असे गायकवाड यांनी सांगितल्यानंतर दोन्ही यंत्रणांना लेखी आदेश देण्यात येतील व आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले. वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेकडून अतिरिक्त वॉर्डन उपलब्ध करून घेत त्यांची नियुक्ती पोलिसांसमवेत गर्दीच्या ठिकाणी केली जाईल व त्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला जाईल असे संदीप सिंह गिल यांनी सांगितले.

      लोणावळा शहरातील भाजी मार्केटचा विषय देखील शासनाकडून विशेष परवानगी घेत मार्गी लावू असे जिल्हाधिकारी पुणे यांनी सांगितले. तसेच कर्मचारी भरतीचा विषय देखील पुढील आठवड्याभरामध्ये मार्गी लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. येथील स्थानिक टॅक्सी चालक-मालक यांच्या रोजगाराचा विषय असलेल्या रस्त्याची माहिती निखिल कवीश्वर यांनी मांडत ओला उबेर यांना लोणावळ्यातून पिकअप करण्यास बंदी घाला अशी मागणी केली. देवदास कडू यांनी नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलासह वाहतूक करण्याचा विषय मांडला. लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर व अंतर्गत रस्त्यांवर ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत व अतिक्रमणे झाली आहेत त्यावर देखील कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये रायवूड भागातील नागरिकांचा समावेश करून घेत त्यांना विस्थापित होण्यापासून वाचवा अशी मागणी केली. 

     खंडाळा येथील शाळेचा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाची एक जागा उपलब्ध करून देऊ असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले आहे. तुंगार्ली धरणाकडे जाणारा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतला असल्यामुळे त्याला वनविभागाकडून परवानगी मिळत नाही असे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला सदरचा रस्ता हा 1980 पूर्वीचा असल्यामुळे तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हा निर्णय फक्त एका रस्त्यापुरता नसून जे जे रस्ते 1980 पूर्वी अस्तित्वात होते त्या ठिकाणी नव्याने रस्ते बनवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्या असा सूचना वन विभागाला दिल्या आहेत. भाजपाचे माजी शहराध्यक्ष अरुण लाड यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी संख्या कमी असल्याने त्याचा परिणाम येथील कायदा व सुव्यवस्थेवर होत असल्याचा मुद्दा अधोरेखित करत पोलीस मनुष्यबळ वाढवण्याची मागणी केली आहे. सूर्यकांत वाघमारे म्हणाले वलवण येथे नगरपालिकेचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे आरक्षण आहे ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित करा. बाळासाहेब जाधव यांनी देखील जागा भूसंपादनाबाबतच्या विषयांबाबत आपली भूमिका मांडली. मनसेचे प्रवक्ते अमित भोसले यांनी वरसोली कचरा डेपो येथील भंगारवाला व त्या माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचार यावर कारवाईची मागणी केली. तर रिक्षा चालकाच्या वतीने मानकर यांनी लोणावळ्यात सीएनजी पंप सुरू करण्याची मागणी केली.

     राजू बोराटे यांनी इंद्रायणी नदीपात्र सुशोभीकरणाचा विषय मांडला. जीवन गायकवाड व दत्ता दळवी यांनी खंडाळा तलावात झालेले प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष गंगाराम मावकर म्हणाले लोणावळा शहरामध्ये सातबारा बंद होऊन सिटीसर्वे करण्यात आले आहे मात्र प्रॉपर्टी कार्ड उतारे मिळत नाहीत व सातबारा देखील होत नाहीत त्यामुळे अनेकांच्या जागेची व मालमत्ता नोंदणीचे विषय रखडलेले आहेत यावर तात्काळ निर्णय घ्या अशी मागणी केली. विवेक भांगरे यांनी नांगरगाव स्मशानभूमीचा विषय मांडला. 

इतर बातम्या