Breaking news

रोखठोक जिल्हाधिकारी l लोणावळा शहराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी थोडा अवधी द्या; तीन महिन्यांनी पुन्हा येईल बदल न दिसल्यास जाब विचारा – जिल्हाधिकारी

लोणावळा : लोणावळा शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या, येथील रस्त्यावरील अतिक्रमणे, कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न, पर्यटन स्थळांवरील पर्यटकांची सुरक्षा, रखडलेले विविध प्रकल्प या सगळ्या गोष्टींमुळे शहराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी थोडा अवधी द्या. तीन महिन्यांनी पुन्हा येईल बदल न दिसल्यास जाब विचारा असे स्पष्टपणे जिल्हाधिकारी पुणे यांनी आढावा बैठकीमध्ये लोणावळाकर नागरिकांना सांगितले आहे. लोणावळा शहरांमधील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे महत्त्वाचे विषय असलेल्या नांगरगाव भांगरवाडी या रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाची जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी पाहणी केली तसेच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झालेली अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांची देखील पाहणी केली. मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल या दोघांनी आज लोणावळा शहराचा दौरा करत येथील समस्यांचा आढावा घेतला व त्याबाबतची नागरिकांची मते देखील जाणून घेतली.

      गवळीवाडा नाका येथील कुमार चौकामध्ये जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी संयुक्त पाहणी करत या ठिकाणची वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात करत व लोणावळा नगरपरिषदेकडून वॉर्डन उपलब्ध करून घेत हे विषय सोडवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत असल्याचे संकेत दिले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी या भागातील नागरिक व व्यावसायिक देखील सकारात्मक असून रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यास देखील त्यांनी संमती दर्शवलेली आहे. 

     लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर कोठेही कसे प्रकारे वाहने उभे केले जातात. तसेच मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असल्यामुळे ती देखील वाहतूक कोंडी होण्यासाठी मोठी समस्या ठरली आहे. लोणावळा नगर परिषदेमध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी लोणावळा शहरांमधील विविध समस्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यासमोर उपस्थित केल्या. दोन्ही अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्याचा पदभार नुकताच सांभाळलेला आहे. दोन्ही अधिकारी म्हणाले, लोणावळा शहरातील विविध समस्या येथील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक कोंडी या सर्व बाबींची आम्ही माहिती घेतलेली आहे. लोणावळा शहराचा हा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी थोडा अवधी द्या, आम्ही याबाबत ॲक्शन प्लॅन तयार केला आहे, तीन महिन्यानंतर आम्ही पुन्हा शहरांमध्ये येऊ आपणास बदल दिसला नाही तर निश्चितपणे जाब विचारा अशा शब्दात त्यांनी नागरिकांना आश्वासित करत पुढील तीन महिन्यांमध्ये लोणावळा शहरांमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, येथील वाहतूक कोंडी या सर्व बाबतीमध्ये सकारात्मक तोडगा काढत कडक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यामधून दिला आहे.


जड – अवजड वाहने बंद करा; आदेशाचे पालन करा


लोणावळा शहरांमधून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेमध्ये सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केलेला असताना देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे लोणावळा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर अनेक अपघात झाले असल्याचे डॉ. किरण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले. आपण दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही, यंत्रणा एकमेकांकडे निर्देश करत जबाबदाऱ्या झटकत आहेत. याचा जाब आम्ही कोणाकडे विचारायचा. स्थानिक प्रशासन आदेशाचे पालन का करत नाही? का जड व अवजड वाहने लोणावळा शहरातून जाणारी बंद होत नाहीत? असा प्रश्न डॉ. गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. या जड अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले आहेत काही लोक जायबंद झाले असून अनेकांचे जीव गेले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी पुणे व पुणे ग्रामीण अधीक्षक यांनी याबाबत संबंधित विभागांना लेखी आदेश पारित करू व अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर कारवाई देखील करू असे स्पष्ट सांगितले आहे.

इतर बातम्या