Lonavala News l जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणावळ्यात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहिम; 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य

लोणावळा : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लोणावळा नगरपरिषद आणि संत निरंकारी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले. यावेळी तब्बल 44 ठिकाणी स्वच्छता मोहिम, तीन ठिकाणी 100 झाडांचे वृक्षारोपण, तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली. यावेळी ‘माझी वसुंधरा’ शपथ आणि ‘प्लास्टिक निर्मूलन’ शपथ घेण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार वृक्ष भेट देऊन करण्यात आला. यानंतर शहरभर 19 स्वच्छता गटांनी कार्यभार सांभाळला. प्रत्येक गटात 30 ते 120 सदस्य असून, प्रत्येक गटाला 1 ते 2 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. स्वच्छता मोहिमेत पर्यटन स्थळे, एस.टी. व रेल्वे स्थानक, तलाव, मार्केट परिसर, उद्याने, धार्मिक स्थळे, वसाहती व मुख्य रस्ते यांचा समावेश होता. वृक्षारोपण जाखमाता मंदिर परिसर, खत्री पार्क परिसर व वलवण नांगरगाव रोड येथे करण्यात आले.
यावेळी संत निरंकारी मिशनचे सुमारे 3500 स्वयंसेवक, लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व जेष्ठ नागरिक संघ यांच्या उपस्थितीने शहरात पर्यावरण जागृतीचे सकारात्मक वातावरण निर्माण झाले. लोणावळा नगरपरिषदने यावेळी जाहीर केले की, या वर्षात शहरात 25 हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 10 हजार झाडांचे वृक्षारोपण वार्ड निहाय करण्यात येणार आहे.
या वर्षीच्या पर्यावरण दिनाची संकल्पना, “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत”. त्यानुसार महाराष्ट्र शासन पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिनांक 22 मे ते 5 जून या कालावधीत विशेष प्लास्टिक निर्मूलन जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेच्या आयइसी टीममार्फत शहरातील आस्थापना, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि राहिवासी भागांत जनजागृती करण्यात आली. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिकला पर्याय वापरण्याचे संदेशही देण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेने भविष्यात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरणसंवर्धनासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शहरातील नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर, हरित व प्लास्टिकमुक्त बनवण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले.