देहूतील समस्या सोडवण्यासाठी एक लाख सह्यांची मोहीम; पालखी प्रस्थानाच्या दिवशी आंदोलनाची घोषणा

देहूगाव (प्रतिनिधी) : देहूगावमधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्या सोडवण्यासाठी 18 जून रोजी संतकृपा मंगल कार्यालयासमोर सकाळी 9 वाजता "एक लाख सह्यांची मोहीम आंदोलन" राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांच्या सह्या गोळा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रमुख मागण्या :
1} देहू-देहूरोड पालखी मार्गाचे रुंदीकरण
2} श्रीक्षेत्र देहू येथे नवीन अतिउच्चदाब वीज उपकेंद्राची उभारणी
3} नगरपंचायतीसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करणे
4} प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी
5} शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र पाणी योजना
6} अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे
गोलांडे म्हणाले, "देहू हे संत तुकाराम महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे वर्षभर लाखो भाविक येत असतात. पण येथे पिण्याच्या पाण्याची, आरोग्य सुविधांची आणि रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. अनेक भागांमध्ये नागरी वस्ती असूनही विकासकामे झाली नाहीत. सरकारकडे वारंवार निवेदने दिली गेली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही."
गोलांडे यांनी नगरपंचायतीकडील निधीच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांना माहिती मिळत नसल्याचा आरोप केला. या मोहिमेची सुरुवात गावातील सर्वसामान्य नागरिक आणि वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, जनतेच्या सहभागातून देहूगावच्या विकासाला गती मिळावी हा या आंदोलनामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.