वारीसाठी 100 हून अधिक रुग्णवाहिका; ‘समारिटन’ अॅपद्वारे तात्काळ वैद्यकीय सेवा

देहूगाव (प्रतिनिधी) : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या 340 व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाने आरोग्यदृष्टीने भक्कम तयारी केली आहे. यंदा पहिल्यांदाच वारीमध्ये राज्यभरातील 10 मानाच्या पालख्यांसोबत 100 पेक्षा जास्त रुग्णवाहिका व कार्डियाक अॅम्ब्युलन्स कार्यरत असणार आहेत.
वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी यंदा ‘समारिटन (SAMARITAN) म्हणजे चांगले नागरिकत्व’ या अॅप्लिकेशनची सुरूवात करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून आपत्कालीन प्रसंगी 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करू शकणार आहे.
रुग्णवाहिका, डॉक्टर व औषधसाठा सज्ज
आरोग्य विभागाचे डॉ. प्रियांक जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व प्रशिक्षित चालक उपलब्ध असणार असून औषधांचा भरपूर साठा ठेवण्यात येणार आहे. या योजनेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचेही सहकार्य लाभणार आहे.
पालखी मार्गांवर —
- देहू ते पंढरपूर (तुकाराम महाराज)
- आळंदी ते पंढरपूर (ज्ञानेश्वर महाराज)
- सासवड ते पंढरपूर (सोपानकाका महाराज)
- या तीन प्रमुख पालख्यांसह इतर सात मानाच्या पालख्यांना प्रत्येकी चार रुग्णवाहिका असतील.
- प्रत्येक मुक्कामस्थळी तीन अतिरिक्त रुग्णवाहिका तैनात राहतील. अशा प्रकारे दररोजच्या प्रवासासाठी किमान सात रुग्णवाहिका उपलब्ध असतील.
‘समारिटन’ अॅपमुळे वेगवान प्रतिसाद
‘समारिटन’ अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळू शकते. रुग्णाचे स्थान चालकाला थेट समजते, त्यामुळे मदतीस विलंब न होता रुग्णवाहिका तत्काळ दाखल होऊ शकते.
या अॅपवरून रुग्ण येईपर्यंत कोणते प्राथमिक उपचार करावेत, याचे पीपीटी स्वरूपात मार्गदर्शनही मिळणार आहे.
अॅप डाऊनलोड कसे कराल?
वारकऱ्यांनी ‘समारिटन’ अॅप गुगल प्ले स्टोअर वा अॅपल स्टोअरवरून डाऊनलोड करून इंस्टॉल करणे आवश्यक आहे.
अॅपची थेट लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.app.good_sam
संस्थांची सहभागिता
या अॅपबाबतची सविस्तर माहिती डॉ. जावळे यांनी श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांना दिली आहे.
आरोग्य विभाग आणि संस्थान यांच्या वतीने प्रत्येक वारकऱ्याला या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.