Lonavala Traffice l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गासह सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी; स्थानिक नागरिक कोंडीने हैराण

पर्यटन हा लोणावळा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा कणा मोडू लागला आहे
लोणावळा : लोणावळा खंडाळा परिसरामध्ये कालचा शनिवार व आजचा रविवार हा वाहतूक कोंडीचा ठरला आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गसह सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याचा त्रास पर्यटकांसह सर्वाधिक येथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आहे. लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी दर शनिवार-रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. येथील स्थानिकांचा रोजगार व अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. हे जरी खरे असले तरी येणाऱ्या पर्यटकांना योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यामुळे त्याचा सर्वाधिक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
पर्यटक वाहनांमुळे केवळ मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर लोणावळा शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. भुशी धरण लायन्स पॉईंट या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. वर्षानुवर्ष वाहतूक कोंडीची ही समस्या निर्माण होत असताना ती सोडवण्यासाठी कोणतेही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस या भागामध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे येथील रस्ते हे अपुरे पडू लागले आहेत. शनिवार व रविवार आला की येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल होऊ लागली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे तक्रारी करून स्थानिक नागरिक कंटाळले आहेत. सोशल मीडियावर ते आपला संताप व्यक्त करत आहेत. मात्र त्यांचा आवाज कोणीही ऐकत नसल्याने आज लोणावळा शहरांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोणावळाकरांना कोणी वाली राहीला आहे का? असा प्रश्न प्रखरतेने पुढे येऊ लागला आहे.
मागील वर्षीपासून खंडाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खंडाळा बाजारपेठेमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. जुना खंडाळा मार्गे वाहने मुंबईच्या दिशेने सोडली जात असल्यामुळे त्या भागातील रहिवाशांना देखील याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे. वलवण गावामध्ये व नांगरगाव परिसरामध्ये नव्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अनेक वाहनेही तुंगार्ली गावातील वेगवेगळ्या रस्त्यांमधून जाऊ लागले आहेत त्या भागात देखील स्थानिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. गवळीवाडा नाका परिसरात देखील वाहतूक कोंडीमुळे वाहने उभे राहत नसल्याने येथील दुकानदारांना केवळ गर्दीकडे बघत बसावे लागत आहे. पर्यटन हा लोणावळा शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी दैनंदिन होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा कणा मोडू लागला असून अनेक पर्यटक या वाहतूक कोंडीला कंटाळून महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर या परिसरामध्ये जाऊ लागले आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांची भविष्यातील गर्दी ध्यानात घेऊन त्याकरिता आवश्यक असलेले मोठे रस्ते, वाहन तळ, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल या सुविधा उपलब्ध करून घेणे गरजेचे आहे.