Breaking news

लोणावळा शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा 15 ऑगस्टपर्यंत फक्त शनिवारच्या दिवशी बंद ठेवण्यात याव्यात – जितेंद्र कल्याणजी

लोणावळा : लोणावळा शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा 15 ऑगस्ट 2025 पर्यंत फक्त शनिवारच्या दिवशी बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी यांनी लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      शासनादेश व शैक्षणिक धोरणानुसार राज्यभरातील सर्व शाळा सोमवार ते शनिवार सुरू ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या नवीन शैक्षणिक वर्षात लोणावळ्यातील शाळा शनिवारी देखील सुरू ठेवण्यात आल्या आहेत. लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने शनिवार व रविवार लोणावळा शहरामध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. शुक्रवारी दुपारनंतरच लोकांमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात होते. पर्यटकांची ही गर्दी व त्यांच्या वाहनांमुळे लोणावळा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना तासन्तास रस्त्यामध्ये अडकून पडावे लागत आहे. याचा विचार करिता, विद्यार्थी व पालक तसेच वाहन चालक यांची होणारी गैरसोय ध्यानात घेता शासनाने 15 ऑगस्ट 2025 पर्यंत फक्त शनिवारच्या दिवशी शाळेला सुट्टी देण्यात यावी अशी मागणी जितेंद्र कल्याणजी यांनी केली आहे. 

      कल्याणजी म्हणाले, लोणावळा शहरामध्ये येणारे विद्यार्थी हे लोणावळा शहर व आजूबाजूच्या गावांमधील असतात. त्यांना शाळेमध्ये येताना स्कूल व्हॅन, बस व लोकल रेल्वे प्रवास करून यावे लागते. जवळपासचे विद्यार्थी हे पायी शाळेमध्ये जात असतात. वाहतूक कोंडीमुळे या सर्व वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. या कोंडीमुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. कोंडीमुळे अनेक स्कूल व्हॅन चालकांनी शनिवारच्या दिवशी विद्यार्थी वाहतूक करण्यास नकार दिला आहे. पालक देखील वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी व्यवसाय असल्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम हा शनिवारच्या उपस्थितीवर देखील होत आहे. अनेक पालकांनी व स्कूल व्हॅन चालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. याकरिता सदरचे निवेदन लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रशासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करत त्या संदर्भात शाळांना व शासनाला सूचित करावे व यावर योग्य तो तोडगा काढत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत फक्त शनिवारच्या दिवशी शाळा बंद ठेवाव्यात अशी मागणी या निवेदनात जितेंद्र कल्याणजी यांनी केली आहे.


इतर बातम्या