Breaking news

विद्यार्थी नेतृत्व परिषदेचा शपथविधी सोहळा उत्साहात संपन्न; लोकशाही मूल्ये, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे आवाहन

खोपोली (प्रतिनिधी) : प. पू. गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, खोपोली येथे विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ चा पदग्रहण व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारी, सेवाभाव तसेच लोकशाही मूल्यांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन शांताराम हिरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर,  के.टी.एस.पी. मंडळाचे उपाध्यक्ष श्री. अबूबकर जळगावकर, पी. पी. गांगगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष  दिनेश गुरव, विश्वस्त राजेश अभाणी आणि प्राचार्य डॉ. गौरव एन. तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वागत नृत्याने झाली. त्यानंतर नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या पदग्रहण सोहळ्याला सुरुवात झाली. विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज व सॅश प्रदान करून त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे सोपविण्यात आल्या. मास्टर सार्थक बाबासाहेब खोजे आणि कु. एलेना राजू इलंजीकल यांनी अनुक्रमे हेड बॉय आणि हेड गर्ल म्हणून पदभार स्वीकारला. तसेच मास्टर प्रेम अनिल भालेराव आणि कु. अनन्या महेश पाटील यांनी उपविद्यार्थी प्रमुख म्हणून पदग्रहण केले. याचबरोबर सांस्कृतिक, आरोग्य, वित्त व शिस्त मंत्री, विविध हाऊसचे कॅप्टन, उपकॅप्टन आणि प्रीफेक्ट्स यांनाही पदचिन्हे प्रदान करण्यात आली. 

     सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी आणि सेवाभावाने आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन शांताराम हिरे यांनी विद्यार्थी नेतृत्व परिषद निवडणूक ही केवळ पदे निवडण्याची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया असल्याचे सांगितले.

      ते म्हणाले की, “आजची तरुणाई देशाची दिशा बदलण्याची मानसिकता ठेवते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आणि लोकशाही मूल्ये जपण्याची शिकवण देणारे असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत.” विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांचा आदर करावा, शिस्त व नैतिक मूल्यांचे पालन करावे तसेच मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासाबरोबरच इतरांच्या हितासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

      डॉ. गौरव तिवारी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना  विद्यार्थी नेतृत्व परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी परिधान केलेला बॅज हा अधिकाराचे नव्हे तर जबाबदारीचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, शिस्त आणि सेवाभाव या मूल्यांना आपल्या नेतृत्वाचा आधार बनवून इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.

      विद्यार्थी नेतृत्व परिषद २०२६–२७ मधील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नेतृत्वगुणांसोबतच जबाबदारी, शिस्त, सेवाभाव आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणारा हा शपथविधी सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

इतर बातम्या