विद्या प्रसारिणी सभेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात गुणवत्ता आणि कर्तृत्वाचा सन्मान

मावळ माझा न्युज नेटवर्क l विद्या प्रसारिणी सभेच्या विविध शाळांमधून दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच शिवाजीनगर येथील रमा रमण हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. औदुंबर उकिरडे (शिक्षण संचालक व अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, पुणे), मीनाक्षी राऊत उपस्थित होते. यावेळी सभेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य श्री. दिलीप सराफ, ॲड. संदीप अगरवाल, श्री. केशव कुलकर्णी, श्री. प्रमोद कुदळे, तसेच भगवान आंबेकर (शाळा समिती अध्यक्ष – व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय, लोणावळा), राजेश मेहता यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे उत्तम निकाल आणि 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या शाळांना सभेच्या वतीने सहा फिरते करंडक प्रदान करण्यात आले. त्यापैकी पाच करंडक व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय यांनी मिळवले, तर एक करंडक विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल ला प्राप्त झाला. पुरस्कार स्वीकारताना शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत भारत इंग्लिश स्कूल यांना प्राप्त धनादेशाचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य, संस्था पर्यवेक्षिका श्रीमती पूजा भुरके व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली. श्री. औदुंबर उकिरडे यांनी विद्यार्थ्यांना मनापासून मेहनत घेण्याचे आवाहन करत शाळांनीही नव्या युगानुसार आपले नियोजन सुधारण्याची गरज व्यक्त केली. डॉ. मृणालिनी गरवारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वर्षी करंडक मिळवण्यासाठी सर्व शाळांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. सतीश गवळी यांनी केला. सूत्रसंचालन श्रीमती वर्षा कुलकर्णी, स्वागतगीत धनंजय काळे, पारितोषिक समितीचे संयोजन श्रीमती अर्चना पगार व श्रीमती सुरेखा अहिरे, पुरस्कार यादी वाचन प्रकाश वाडे, तर समारोपाला श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांनी पसायदान गायन केले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा हवालदार यांनी मानले. हा सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, विद्या प्रसारिणी सभेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा हा एक गौरवशाली क्षण ठरला.