पालखी प्रस्थान सोहळा l टाळ मृदुंगाच्या गजरात व लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरीकडे रवाना

देहूगाव : रंगी बेरंगी छत्र्या व प्लॅस्टिकची घोंगटी अंगावर घेऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतील इनामदार वाड्यातील आपला पहिला मुक्काम संपवुन शासकीय महापूजेनंतर साडेदहा वाजता वरुण राजांच्या उपस्थिती औद्योगिक, क्रीडा, शैक्षणिक व कलेचे शहर असलेल्या पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी गावाकडे लाखो वैष्णव जनसागर रवाना झाला. देऊळ वाड्यातील पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची विधीवत शासकीय महापूजा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील त्यांच्या पत्नी सुजाता, उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने व त्यांच्या पत्नी दैवशाला, पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसिलदार जयराज देशमुख व त्यांच्या पत्नी उज्ज्वला देशमुख, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
यावेळी नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरसेविका पूनम काळोखे, सपना मोरे, रसिका काळोखे, अभियंता संगपाल गायकवाड, करसंकलन अधिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे, महसूल विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी आदी उपस्थित होते. महापूजेनंतर सकाळी साडेदहा वाजता पालखीचे मुख्य चौपदार नामदेव गिराम यांनी पालखी सोहळा प्रमुखांच्या आदेशानुसार पालखी निघाल्याची घोषणा केली. तेथे आरती करून पालखीचे भोई यांनी पालखी खांद्यावर घेतली. वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगच्या साथीत हरिनामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र जपत पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी देहू पंचक्रोशीतील अबाल वृद्धासह वारकरी पालखी मार्गावर दुतर्फा दर्शनासाठी उभे होते. दर्शन घेतल्यानंतर माघारी फिरत होते.
पालखी मार्गस्त होण्याची वेळ जशजशी जवळ येत होती तस तशी सकाळी परंपरे प्रमाणे दिंड्या आपल्या क्रमाकांवर चालत हरिनामाचा गजर करीत पालखी मार्गावर आल्या. साडेदहा वाजता अभंग आरती होऊन पालखी इनामदार वाड्यातून बाहेर आली. यावेळी उपस्थित भाविकांनी जल्लोश करीत ज्ञानोबा तुकाराम गजर करीत अभंगा बरोबरच भजन सुरु केले. देहू परिसरात चांगलाच पाऊल पडत असल्याने हवेत गारवा होता. पालखी इनामदार वाड्यातून पालखी मार्गावर आल्यानंतर व देतूतील मुख्य प्रवेशद्वार कमानीतून बाहेर पडताना जोरदार पावसाने सुरवात केली. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अशाही वातावरणात वारकऱ्याचा उत्साह कमी झालेला नव्हता. तर स्थानिक नागरिक व भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी इनामदार वाड्यात समोर गर्दी केली होती.
ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी थांबविली जात होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पालखी प्रवेशद्वार कमानीतून बाहेर येताच एक प्रदक्षिणा घालून पालखी देहूच्या वेशी बाहेर पडली. काही स्थानिक रहिवाशांनी येथून पालखीला आपला निरोप देत माघारी फिरले. दरम्यानच्या काळात देहूनगरपंचायतीच्या वतीने जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रत्येक दिंडीतील विणेकऱ्याना पालखी आरोग्य कीट व उपरणे देऊन वीणेकऱ्याचा व तुळस घेतलेल्या महिलेचा तहसिलदार जयराज देशमुख, नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगरसेवक योगेश काळोखे, नगरसेविका पूनम काळोखे, सपना मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, संगपाल गायकवाड, माजी सरपंच रत्नमाला करंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. मात्र पोलीसांनी पालखी भोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने दोर लावलेला होता. पालखी भोवती पोलीस व पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते यांनी दोर लावून कडे केले असल्याने भाविकांनी पालखीचे दुरून दर्शन घेण्यातच धन्यता मानली. सकाळी साडे अकरा वाजता पालखी महाद्वार प्रेवशद्वार कमानी मध्ये (वेशीवर) तून बाहेर पडली. पालखी कापूर ओढा येथील अनगडशहावली दर्ग्याजवळ आल्यानंतर पहिली अभंग आरती बाळासाहेब काशिद व त्यांचे कुटुंबिय, परंडवाल, बिरदवडे, वारघडे कुटुंबिय आदींच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी अनगडशहावली दर्गा मंदिरात सेवा करणारे कार्यकर्त्यांसह वारीतील सहभागी झालेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभंग आरती नंतर आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. येथे स्थानिक ग्रामस्थांसह सोहळ्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली केली होती. आरती होताच परिसरातील भाविकांनी पालखीला भावपूर्ण निरोप देवून माघारी फिरले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ देहू व रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने वारकऱ्यांना प्लॅस्टिकचे घोंगटे वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी केळी, राजगिरा लाडू तर काही नागरिकांनी पेढे वाटप केले. पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीकॅमेरे लावले होते. वॉच टॉवर उभारलेले होते. यावरून पोलीस सोहळ्यावर लक्ष ठेवून होते. भर पावसात रेनकोट घालुन पालखीचे सरंक्षण करीत पालखी भोवती दोरखंड धरून मार्गक्रमण करीत होते. पोलीसांसह सर्वच अधिकारी वर्ग यांचा अंहकार गळुन पडलेला दिसून येत होता आणि प्रत्येकजन आपआपल्या परिने भाविकांची वारकऱ्यांची सेवा बजावताना दिसत होते. पालखी मार्गावर वैद्यकीय पथ देखील पावसात आपले काम करताना दिसत होता. रुग्णवाहिका, क्रेन, अग्निशमन वाहने पाण्याचे टॅकर सज्ज होते.